February 7, 2026

“सीमेवर शत्रूशी लढा अन् शिक्षणात यशाचा कडा! विक्रम नाईकनवरे यांनी गाठले यशाचे शिखर!”

Please follow and like us:
Pin Share

पंढरपूर (प्रतिनिधी): हातात शस्त्र धरून सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानाची जिद्द किती अथांग असू शकते, याचे ज्वलंत उदाहरण पंढरपूरचे सुपुत्र मेजर विक्रम राजाराम नाईकनवरे यांनी जगासमोर ठेवले आहे. लष्करी सेवेची खडतर कर्तव्ये बजावत असतानाच, त्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ३१ व्या दीक्षांत समारंभात ‘माध्यम आणि पत्रकारिता’ विषयाची पदवी प्रथम श्रेणीत संपादन करून एक नवा ‘विक्रम’ प्रस्थापित केला आहे.

आजच्या धावपळीच्या आणि इंग्रजीच्या प्रभावाखालील जगात मेजर नाईकनवरे यांनी आपल्या शिक्षणाचे माध्यम ‘मराठी’ ठेवले. लष्करी शिस्त आणि पत्रकारितेचा व्यासंग यांचा सुरेख संगम साधत त्यांनी ही पदवी मिळवली. “मेहनत आणि सातत्य असेल तर कोणतेही शिखर सर करता येते,” हेच त्यांनी आपल्या यशातून सिद्ध केले आहे. मराठी भाषेतून पत्रकारिता शिकून त्यांनी ग्रामीण भागातील तरुणांसमोर गुणवत्तेचा एक नवा आदर्श घालून दिला आहे.

नाशिक येथे पार पडलेल्या या ऐतिहासिक दीक्षांत सोहळ्याला अभूतपूर्व गर्दी होती. सुमारे १ लाख २४ हजार विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून माजी अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. निर्मलजीत सिंह कलसी उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात मेजर नाईकनवरे यांच्यासारख्या जिद्दी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनावणे यांच्यासह शैक्षणिक क्षेत्रातील अनेक दिग्गज आणि मान्यवरांची उपस्थिती होती.

मेजर विक्रम नाईकनवरे यांचा हा प्रवास सोपा नव्हता. लष्करातील जबाबदाऱ्या सांभाळत असताना अभ्यासासाठी वेळ काढणे ही एक मोठी कसरत होती. मात्र, समाजमनाचे प्रतिबिंब असणाऱ्या पत्रकारिता क्षेत्राबद्दलची ओढ त्यांना स्वस्थ बसू देईना. अखेर त्यांनी हे यश संपादन केलेच. त्यांच्या या यशाबद्दल पंढरपूर आणि पुणे परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, “लढवय्या सैनिक आता सजग पत्रकार” झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

Please follow and like us:
Pin Share
Copy link
URL has been copied successfully!